हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा लागवड फायदेशीर; कमी कालावधी, वन्यप्राण्यांपासून संरक्षण आणि निश्चित उत्पन्न
विशेष प्रतिनिधी, बीड:
रब्बी हंगामात हरभरा आणि गहू यांसारख्या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून कमी कालावधीत, कमी खर्चात आणि वन्यप्राण्यांच्या त्रासाशिवाय चांगले उत्पन्न देणाऱ्या पिकाचा शोध अनेक शेतकरी घेत आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ‘राजमा’ एक उत्तम पर्याय ठरू शकतो, अशी माहिती बियाणे विक्रेते आणि कृषी अभ्यासक विष्णू तांदळे यांनी दिली. त्यांच्या मते, राजमा पिकाची योग्य माहिती घेऊन लागवड केल्यास शेतकऱ्यांना एकरी ९ ते ११ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते.
अनेक शेतकरी राजमा लागवडीसाठी नवीन असल्याने त्यांच्या मनात पेरणी, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि बाजारपेठेविषयी अनेक प्रश्न असतात. या सर्व बाबींवर तांदळे यांनी सविस्तर प्रकाश टाकला.
वन्यप्राण्यांच्या त्रासातून सुटका आणि मजुरी खर्चात बचत
राजमा लागवडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे या पिकाला रानडुक्कर, हरीण, नीलगाय किंवा ससे यांसारखे वन्यप्राणी खात नाहीत. त्यामुळे ज्या भागात वन्यप्राण्यांचा उपद्रव जास्त आहे, अशा भागातील शेतकऱ्यांसाठी हे पीक एक वरदान ठरत आहे. याशिवाय, हे पीक पेरणीपासून अवघ्या ८० ते ८५ दिवसांत काढणीला तयार होते, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी वेळेत रोख रक्कम हातात येते. या पिकावर तणनाशकांचा वापर करता येतो आणि काढणीसाठी मळणी यंत्र (थ्रेशर) वापरता येत असल्यामुळे खुरपणी आणि काढणीसाठी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात मोठी बचत होते.
लागवडीचे सोपे तंत्रज्ञान
राजमा लागवड मध्यम ते भारी जमिनीत यशस्वीपणे करता येते. एकरी २५ ते ३० किलो बियाणे लागते, ज्यामध्ये वाघा, वरुण, ब्राझील वाघा यांसारख्या प्रचलित जाती चांगला प्रतिसाद देतात. पेरणीवेळी एकरी ५० ते १०० किलो १०:२६:२६ किंवा १२:३२:१६, सोबत ५० किलो युरिया देणे आवश्यक आहे. जमिनीत हुमणी किंवा इतर किडींचा प्रादुर्भाव असल्यास फर्टेरा किंवा फ्युरीसारखी दाणेदार कीटकनाशके वापरण्याचा सल्ला दिला जातो. उगवणीनंतर २० दिवसांनी पुन्हा ५० किलो युरियाचा हप्ता द्यावा. फुलोऱ्यातून शेंगा भरण्याच्या अवस्थेत विद्राव्य खतांची फवारणी केल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते.
पिकात तणांचा प्रादुर्भाव झाल्यास ‘आमोरा’ किंवा ‘फुजीफ्लेक्स’ यांसारख्या तणनाशकांची फवारणी करून खुरपणीचा खर्च पूर्णपणे टाळता येतो.
बाजारभाव आणि विक्री व्यवस्था
राजमा पिकाला सरासरी ९,००० ते १०,००० रुपये प्रति क्विंटल असा स्थिर आणि चांगला बाजारभाव मिळतो. काढणीनंतर लगेच विकण्याची घाई नसल्याने शेतकरी १ ते २ वर्षे सहज साठवणूक करू शकतात, ज्यामुळे योग्य भाव आल्यावर विक्री करण्याचे स्वातंत्र्य मिळते. बीड, लातूर, सोलापूर आणि सांगली येथे स्थानिक व्यापारी राजमा खरेदी करतात आणि हा माल प्रामुख्याने दिल्लीच्या मुख्य बाजारपेठेत पाठवला जातो.
‘नवघन सीड्स’चे विष्णू तांदळे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांनी लागवड केल्यास त्यांना विक्रीसाठी व्यापाऱ्यांशी संपर्क जोडून देण्यास आम्ही मदत करू शकतो. हे नगदी पीक असून, कमी पाण्यात आणि कमी त्रासात शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळवून देण्याची क्षमता यात आहे.”